वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी राज्य सरकारला घेरण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मुंबईत धरणे देण्याची घोषणा बहुजन रिपब्लिकन समाज पक्षाने केली आहे. पक्षाच्यावतीने उपाध्यक्ष अहमद कादर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिन, १ मेपासून विदर्भात पदयात्रा काढण्यात आली. त्याचा समारोप सोमवारी संविधान चौकात एका जाहीर सभेच्या रूपात झाला. पक्षाचे संस्थापक अॅड. सुरेश माने अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपस्थित माजी खासदार जांबुवंतराव धोटे, किशोर गजभिये, पक्षाचे विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी, सिद्धार्थ पाटील, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, नयना धवड, डॉ. जनबंधू, राजेश बोरकर, जावेद पाशा उपस्थित होते.
वेगळ्या विदर्भासाठी नेत्यांनी जनतेची फसवणूक केली. भाजपने आश्वासन देऊन त्याची अद्याप पूर्तता केलेली नाही. आजही विदर्भ मागासलेला असून, यावरून दिशाभूल करण्यात येत आहे. त्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुंबईत धरणे देण्यात येईल, अशी घोषणा अॅड. माने यांनी केली. पोलिस ठाणे असो, नाही तर सरकारी कार्यालये, त्यातील ७० ते ८० टक्के अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. विदर्भातील तरुणांची हक्काची नोकरी गेली आहे. याविरुद्ध येणाऱ्या काही दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसोबतच शेतकरी, शेतमजुरांना चार हजार रुपये महिना पेन्शन द्या, तरुणांना रोजगार द्या आणि लोडशेडिंग बंद करा, या मागण्यांसाठी ही पदयात्रा होईल. वाशीम, बुलडाणातून वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थन नसल्याचे दावे पोकळ आहेत. विदर्भात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. वातानुकूलित कक्षात बसून आंदोलनाची चर्चा करण्याऐवजी जनतेपर्यंत ही मागणी पोहचवणे आवश्यक आहे. त्याला आपोआप जनसमर्थन मिळेल, असा दावा अहमद कादर यांनी 'म.टा.'शी बोलताना केला.
कडक उन्हाची पर्वा न करत तब्बल ३० दिवस ही पदयात्रा चालली. यात १३०० किलोमीटर अंतर पूर्ण केले. क्लाडिअर पीटर, मोंटू शर्मा, आशा पाटील, रमेश अलोणे, कैलास चरडे यांच्यासह रोज सरकारी ७० ते ७५ कार्यकर्ते व गावकरी यात सहभागी व्हायचे. शनिवारी नागपुरात पोहचल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही सहाही विधानसभा मतदारसंघात पदयात्रा काढली, असेही कादर यांनी सांगितले.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट